जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जालना येथील दोन नातेवाईकांचा भुसावळ शहरातील तापी नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बुधवारी, २१ मे रोजी सकाळी सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतांमध्ये मामा आणि भाचा यांचा समावेश असून, त्यांची नावे रामराजे नंदलाल नाटेकर (वय ५५) आणि आर्यन नितीन काळे (वय २१) अशी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, भुसावळ शहरातील मामाची टॉकीज परिसरातील पेंढारवाडा येथे संदीप हरिश्चंद्र रणधीर यांच्या घरी देवकार्याच्या निमित्ताने हे दोघे आले होते. २१ मे रोजी सकाळच्या सुमारास ते दोघेही तापी नदीत आंघोळीच्या उद्देशाने गेले होते. आंघोळ करताना अचानक पाय घसरल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोघांना पाण्याबाहेर काढून भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमन चौधरी यांनी त्यांना मृत घोषित केले. या बाबत भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये नोंद घेण्याचे काम सुरू असून, पुढील तपास सुरु आहे.
टिप्पणी पोस्ट करा