जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तालुक्यातील धानवड येथे सोमवारी रात्री विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. शेतात पिकांची राखण करत असताना वीज कोसळून अंकुश विलास राठोड (वय १५) या बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे आजोबा शिवाजी जगराम राठोड (वय ६५) गंभीर भाजले. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेतात पिकांची राखण करत असताना दुर्दैवी घटना
धानवड गावातील अंकुश राठोड हे आपल्या आजोबांसह शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेले होते. दरम्यान, सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. धानवड ते भवानी खोरा रस्त्यावर असलेल्या शेतात वीज कोसळल्याने अंकुशचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे आजोबा शिवाजी राठोड गंभीर भाजले गेले.
गावकऱ्यांची तत्परता, पण जीव वाचवता आला नाही
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच अंकुशचा मृत्यू झाला. शिवाजी राठोड यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेतली जात आहे.
गावात शोककळा
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे धानवड गावावर शोककळा पसरली आहे. अंकुश राठोडच्या दुर्दैवी मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
टिप्पणी पोस्ट करा