जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील शिवराम नगर परिसरात माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई बंगला येथे झालेल्या घरफोडीचा छडा रामानंद नगर पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून तब्बल ६ लाख २१ हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी अजून फरार आहेत.
घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की, २७ ऑक्टोबरच्या रात्रीपासून २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत मुक्ताई बंगला बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी चेतन सुरेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यात वापरलेली सुजुकी बर्गमन दुचाकी (MH-19-ER-5539) शोधण्यात आली. या दुचाकीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावल्यावर, त्याच्या नातेवाईकांनीच चोरी केल्याचे उघड झाले.
त्यानुसार पोलिसांनी जियाउद्दीन हुस्नोददीन शेख (वय ३९, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याला अटक केली. पुढील चौकशीत आरोपींनी चोरीचा माल उल्हासनगर येथे सोनाराकडे विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मुंबई गाठून चिराग इकबाल सैय्यद (वय २२, रा. उल्हासनगर) आणि कैलास हिराचंद खंडेलवार (वय ४८, रा. कल्याण) यांनाही अटक केली.
त्यांच्या ताब्यातून ६ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यात ३१.९७० ग्रॅम सोन्याची लगड, विविध दागिने, अंगठ्या, चैन, कानातील रिंग तसेच २१७ ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्ती यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी — मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी आणि ‘बाबा’ (पूर्ण नाव अज्ञात) — हे तिघेही उल्हासनगर, मुंबई येथील असून सध्या फरार आहेत. या आरोपींविरुद्ध मुंबई आणि गुजरातमधील विविध ठाण्यांत २० पेक्षा जास्त चोरी व घरफोडीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन रणेशवरे, सुशिल चौधरी, जितेंद्र राजपूत, विनोद सुर्यवंशी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे शरद बागल, अक्रम शेख, प्रितम पाटील आदी अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन रणेशवरे करीत आहेत.
या यशस्वी कारवाईमुळे जळगाव पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यकुशलता सिद्ध केली असून, शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीत नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा