Top News

शेतकरी जनआक्रोश मोर्चातून सरकारवर सडकून टीका; बच्चू कडू यांचा संतप्त सवाल – शेतकरी गप्प का?

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महायुती सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे राज्यात शेतकरी टिकून राहतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संपवणुकीचीच व्यवस्था करून ठेवली आहे, अशी टीका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बुधवारी जळगावात केली.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसतर्फे सोमवारी काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चाच्या धर्तीवर जळगावमध्येही जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये काळे कपडे परिधान करून आणि काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करण्यात आला. केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घोषणाबाजी करत लक्ष वेधण्यात आले.

या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गटाचे) नेते व माजी खासदार उन्मेश पाटील तसेच बच्चू कडू यांनी केले. शेतकऱ्यांसमोर बोलताना दोन्ही नेत्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

बच्चू कडू म्हणाले की, “राज्यातील कोणताही शेतकरी आज सुखी नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. केळीचा भाव ३०० रुपयांवर घसरला आहे, कापसाला केवळ सहा हजार आणि सोयाबीनला ३४०० रुपयांपेक्षा अधिक भाव मिळत नाही. ज्वारी वेळेवर खरेदी होत नाही, बियाण्यांचा तुटवडा आहे, कीटकनाशकांमध्ये घोटाळा आणि खतांमध्ये भेसळ सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकरी सर्व बाजूंनी होरपळला आहे. तरीही ते गप्प का आहेत? सरकारचा राग का करत नाहीत?” असा सवाल त्यांनी केला.

कडू पुढे म्हणाले की, “१०० रुपये कमी-जास्त झाले तर आपण रिक्षाचालकाशी वाद घालतो, मजुराने ५० रुपये जास्त मागितले तर भांडतो, पण सरकार क्विंटलमागे तीन हजार रुपयांनी लुटते, तरीही शेतकरी मौन बाळगतो. ही लूट आजची नाही तर अनेक वर्षांपासून सुरू आहे.”

यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेतकऱ्यांच्या शांततेमुळेच सरकारला मोकळे रान मिळाले आहे. “माझ्यावर ३५० गुन्हे दाखल आहेत, काहींमध्ये शिक्षा देखील झाली आहे. पण माझ्या आईने मला शेतकरी व अपंगांसाठी लढायला पाठबळ दिले. मात्र, तुम्ही गुन्हा दाखल होईल म्हणून घाबरत आहात. असा भ्याडपणा सोडून लढा दिला पाहिजे. तुमच्या जिल्ह्यातील संकटमोचक नेते पक्षापुरतेच मर्यादित आहेत. जनतेसाठी ते काहीच करत नाहीत. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावर एकेकाळी जोरात आवाज करणारे कार्यकर्तेही आता गप्प बसले आहेत.” असा टोला त्यांनी हाणला.

या मोर्चामध्ये जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने