तात्काळ उपाययोजना न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा शिवसेनेचा इशारा
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील कानळदा, कुवारखेडा, नंदगाव, नांद्रा बुद्रुक, पिलखेडा आदी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून (३ व ४ सप्टेंबर) बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंतच्या हल्ल्यात एका महिला शेतकरी महिलेसह तीन गुरांचा बळी गेला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी वनविभागाला इशारा दिला आहे की, तात्काळ उपाययोजना न केल्यास ठिय्या आंदोलन छेडले जाईल.
प्रा. सोनवणे यांनी सांगितले की, “बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ जागोजागी पिंजरे लावावेत, ट्रॅप कॅमेरे बसवावेत, पाऊलखुणांचा मागोवा घ्यावा तसेच रात्री गस्त घालावी. भविष्यात आणखी जीवितहानी टाळण्यासाठी या उपाययोजना त्वरित होणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले की, “बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग अयशस्वी ठरल्यास आणि त्यामुळे कुठलीही जीवितहानी अथवा नुकसान झाले, तर त्यासाठी वनसंरक्षक विभागातील अधिकारीच जबाबदार राहतील.”
या वेळी प्रमोदभाऊ घुगे, सोपान धनगर, प्रवीण बिऱ्हाडे, जगदीश पाटील, उमेश पाटील, प्रमोद पाटील यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा