Top News

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार



जळगाव महानगरपालिकेचा अ‍ॅक्शन प्लॅन; महापौरांसह अधिकाऱ्यांची पाहणी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहराच्या विकासात अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरुद्ध जळगाव शहर महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. अजिंठा चौक ते कुसुंबा दरम्यान असलेल्या अतिक्रमधारकांना पालिकेने दिलेल्या नोटिसीची मुदत संपली असून, येत्या दोन ते तीन दिवसांत या भागातील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याची धडक कारवाई करण्यात येणार आहे.

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी (८ एप्रिल) दुपारी अजिंठा चौक परिसरात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


महापौरांचे कडक निर्देश

अजिंठा चौक ते कुसुंबा हा रस्ता महापालिकेच्या हद्दीत येतो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने यापूर्वीच संबंधितांना नोटिसा बजावल्या होत्या. आता या नोटिसांची मुदत संपल्याने कोणत्याही क्षणी बुलडोझर चालवला जाणार आहे.

पाहणी दरम्यान महापौरांनी केवळ अजिंठा चौक ते कुसुंबा रस्त्याच नव्हे, तर अजिंठा चौक ते कालिका माता मंदिर दरम्यान नव्याने निर्माण झालेली अनधिकृत अतिक्रमणे देखील तात्काळ काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. रस्त्याच्या कामात किंवा रहदारीत येणारे कोणतेही अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशी भूमिका महापौरांनी यावेळी स्पष्ट केली.

ठळक मुद्दे

दोन दिवसांत कारवाई: नोटिसीची मुदत संपल्याने पुढील ४८ ते ७२ तासांत प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल.

रस्ते होणार मोकळे: रस्त्यामध्ये येणारी सर्व कच्ची-पक्की अतिक्रमणे काढली जाणार आहेत.

अधिकाऱ्यांची उपस्थिती: पाहणी दौऱ्यात उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख उपस्थित असल्याने मोहिमेची तयारी पूर्ण झाल्याचे संकेत मिळत आहेत.

या धडक मोहिमेमुळे अजिंठा चौक परिसरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, महापालिका प्रशासन आता प्रत्यक्ष कृतीसाठी सज्ज झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने